sagale ulthavun takale pahije

सगळं उलथवून टाकणाऱ्या कविता!

भांडी इकू नगस

राहू नगस उपाशी

अनवाणी चालू नगस

लुगड्याला ठिगळ लावू नगस

असं म्हणायचास लहानपणी

अन मंग

आता शाली, नारळ, स्मृतिचिन्ह

जी येतात घरात

पेपरात असतो, टिव्हीत दिसतो कधीमधी

मला सांग

शिक्षण जर घेतलं नसतं तर…

हे झालं असतं का रे?

अडाणी कुठला

कवी देवा झिंजाड यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या पुस्तकातील ही ‘अडाणी’ कविता. किती वेगळी कल्पना आहे ना ही! कधीही शाळेत न गेलेली पण शिक्षणाचं महत्व जाणून काबाडकष्ट करून मुलाला शिकवणारी आई अडाणी कशी म्हणायची ना? उलट तिला तर शिक्षणाचं महत्व सगळ्यात जास्त कळलं आहे. किती वेगळा दृष्टिकोन आहे हा! देवा झिंझाड यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या पुस्तकातुन या अशाच वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याच आजूबाजूचं जग दाखविणाऱ्या कविता आपल्यासमोर येतात आणि अवाक् करतात.

जिकडे पाहावे तिकडे

अपराध्यासारखे खाली मान घालून

चालतायेत मोबाईल

मोबाईलसमोर मोबाईल असूनही

एकमेकांशी बोलत नाहीयेत मोबाईल

चिन्हातच चिणून मारताहेत मोबाईल

काय हिरवं काय वाळलं आजूबाजूला

काहीच बघत नाहीयेत मोबाईल

सहज सोप्प्या शब्दांतील या कवितांचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील रूपक. कवीने रुपकांच्या माध्यमातून भावना इतक्या सूचकपणे मांडल्या आहेत की त्यांनी तुमच्या मनाचा वेध घ्यायलाच हवा आणि “आईशप्पथ! काय भारी लिहिलंय हे!” असं कितीतरी वेळा पुस्तक वाचताना होणारच. देवा झिंझाड यांच्या ‘बांगडी’ कवितेतील मला आवडलेल्या काही ओळी…

बांगडीच्या पोटी जन्म घेते बांगडी

हाती बांगडी घालता

बांगडी म्हणून जगाया सज्ज होते बांगडी

मर्यादा सांभाळत बांगडीच्या

झगडत जाते बांगडी

रानातही रापते चालवते संगणक बांगडी

उडवते विमान लेखणी होते बांगडी

फोडली जाते कधीकधी गर्भातच बांगडी

बाहेर आल्यावरही झोडली जाते बांगडी

विधवा होते बांगडी

बाप होते बांगडी

गरीब असो वा श्रीमंत

सदैव…. त्याच परिघात

किणकिणत राहते बांगडी

मिणमिणत राहते बांगडी

किती सुंदर रचना आहे ही. बांगडीच्या रुपकातून स्त्रियांचं आयुष्य किती सहज सोप्प्या शब्दात पण तितक्याच गंभीरपणे मांडलंय. या पुस्तकातील जवळजवळ सगळयाच कविता अशा वेधक आहेत. एका सुरक्षित आणि संकुचित वर्तुळात राहून विहिरीतल्या बेडकासारखं त्या परिघालाच जग समजणाऱ्या अनेक संवेदनशून्य मनांना या कवितांमधून दिसणारं त्यांच्या परिघाबाहेरचं जग अस्वस्थ करणारच. जशी ही ‘तहानवेडे’ कविता.

वॉशिंग मशीन लावून

टीव्ही मालिका पाहणारी बाईसाहेब

ओरडत असते

नळाला प्रेशर कमी आहे म्हणून

अन त्याच वेळेला

एखाद्या पाण्याच्या हंड्यासाठी वणवण फिरणारी

गावाकडची लेकुरवाळी बाई

कशीबशी भिजवत असते

झोळीतले कोरडे ओठ

‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या नावामुळे या पुस्तकात काहीतरी क्रांतिकारी, त्वेषपूर्ण किंवा अन्यायाला वाचा फोडणारं एवढंच असेल असा समज होणं साहजिक आहे, पण एवढीच या पुस्तकाची ओळख आहे, असं मला नाही वाटलं. अनेक कवितांमधून या कवीच्या सरल, हळव्या मनाची, आईच्या संस्काराची, उत्कृष्ट निरीक्षणशक्तीची आणि कलात्मकतेची प्रचिती सतत येत राहते आणि त्यातले विचार आपल्याला अंतर्मुख करत प्रश्न विचारतात की,

शाळा सुटायच्या आधीच जिथं मांडला जातो पत्त्यांचा डाव

पोटापुरती जमीनसुद्धा टाकावी लागते जिथं गहाण केवळ पुस्तकांसाठी

अन विकावं लागतं स्वतःला लेकराच्या पाटी पेन्सिलीसाठी

असल्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या

गावाला आदर्श कसं म्हणायचं?

मनात काहूर माजवणाऱ्या आणि सुन्न करणाऱ्या या सगळ्या रचना. या वास्तवापासून आपण कोसो दूर असल्याची किंवा वास्तवाकडे डोळेझाक करत असल्याची जाणीव करून देणाऱ्या.

कवी देवा झिंझाड यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील व्यवस्था,लोकांचे राहणीमान व दृष्टिकोन, निसर्ग आदी विविध विषयांवर कविता लिहिल्या आहेत व त्यातील दृष्टीकोन अगदी खोल, आतला, खरा व त्यांच्या जगण्याच्या संघर्षातून आलेला असल्याने त्या आपल्या मनाला हलवून टाकतात आणि गोष्टींकडे बघण्याची, इतरांच्या भावना जाणण्याची वेगळी दृष्टी देतात आणि हा बदल नक्कीच सुखद आणि प्रेरक आहे.

कवी देवा लिहितात, ‘जे जे खटकत गेलं आणि ज्यामुळं वर्तमानावर अरिष्टाचं सावट वाढत गेलं किंवा दिवसेंदिवस वाढतंय ते ते सगळं उलथवून टाकलं पाहिजे, असं मनोमन वाटत राहिलं, ते कवितेतून कागदावर उतरत गेलं’.

पुस्तकातील कवीचे मनोगत नक्की वाचावे, असं आवर्जून सांगेन. या कविता सुचण्या किंवा लिहिण्यामागचा उद्देश, कवीचा प्रवास याची फार जवळून ओळख होईल.

मनोगतात ते लिहितात, ‘कवितेने फार काही करावं, हातात बंदुका किंवा तलवारी घ्याव्यात, क्रांती घडवावी या मताचा मीही नाही. परंतु कमीत कमी आपल्या कवितेनं आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघताना डोळे उघडे ठेवून बघायला शिकवलं तरी पुष्कळ आहे, असं मला वाटतं. कारण कवितेने प्रश्न सुटत नसले तरी प्रस्थापित प्रश्नांना धार मात्र नक्की येते.’

कविता कशी असावी याबद्दल ‘कवी देवा’ यांचे मनोगतातील आणि पुस्तकातील दोन कवितांमधून मांडलेले विचार नवकवींना उत्तम मार्गदर्शन करणारे आहेत.

ते लिहितात, ‘नवीन लिहिणाऱ्या हातांचा असा गैरसमज झालाय की, व्यासपीठावरून सादर केली जाते तीच खरी कविता असते. परंतु ही गोष्ट साहित्याला मारक नसली तरी तितकीशी पूरकही नाहीये. कवी अनेक झाले, होतीलही, परंतु सगळ्यात आधी एक चांगला माणूस म्हणून आपण समाजात वावरले पाहिजे. जमिनीसारखी सृजनशीलता प्रत्येक कवीकडे येते अन त्याला भवतालच्या वास्तवाची जाणीव प्रकर्षाने होते तेव्हाच अशी माणसे चांगली निर्मिती करतात.’

ज्या मातीत वाढतो त्या मातीशी आणि मातेशी कृतज्ञ राहत, वास्तवाचं भान ठेवत, सर्वांना सहज समजतील अशा आशयघन कविता लिहिणाऱ्या सृजनशील आणि संवेदनशील मनाच्या कवीचं हे पुस्तक. या कवितासंग्रहाला राज्यस्तरीय ग.दि. माडगूळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मी अलीकडच्या काळात वाचलेल्या कवितांच्या पुस्तकांमध्ये मला सर्वात जास्त भिडलेलं आणि आवडलेलं पुस्तक. संग्रही असायलाच हवं असं. पुस्तकातील अजून एक रचनेतील काही ओळी शेवटी देतेय. पुस्तक मिळवून नक्की वाचा.

विठ्ठलाला भेटाया हातात लडिवाळ टाळ घेते कविता

काळजात तुमच्या आमच्या दाबलेला उमाळा असते कविता

मारले खिळे हातापायावर तरी दुसऱ्यांसाठी सुखाचे दान मागते कविता

आयुष्य स्वराज्यासाठी लावून पणाला आग्र्याहून सुटते कविता

धरून मुठीत नाक जीवनशैलीची घाण पोटात घेवून वाहत राहते कविता

मातीतूनच उगवलेल्या झाडावरच फास घेऊनी मातीमोल होते कविता

रिकाम्या घरट्यामध्ये होऊन वेडी शहाण्यासारखी वागते कविता

तारुण्याची वसवस क्षितिजावर वार्धक्य सोसत खरडत राहते कविता

©अश्विनी सुर्वे

पुस्तकाचे स्वागत मूल्य – १४०/-

(ही किंमत पुस्तकाच्या पूर्वप्रकाशनावेळेची होती.)
पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क – कवी देवा झिंजाड – 989069709

amazonवरून विकत घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *